यशाचे शिखर गाठण्याचा मनात विश्वास असेल तर खडतर मार्गही सोपा वाटू लागतो. त्यासाठी मेहनत, जिद्दीची साथ हवी. या दोन्हींची सागंडच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आयपीएस विश्वास नांगरे पाटील! हे नाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. दरडोही जीवनात आलेल्या संकटांवर मात करून यश संपादन करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांचा एकूण जीवनप्रवास मोलाचा ठरला आहे. पोलीस खात्यात कर्तव्य बजावताना पुण्यामध्ये केलेल्या रेव पार्टीच्या कारवाईमुळे विश्वास नांगरे पाटील हे सर्वप्रथम नागरिकांच्या कानी पडले. तसेच मुंबईत २६/११ च्या दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावून विश्वास नांगरे-पाटील हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले.

कोरोना संकट काळात नाशिक पोलीस आयुक्त पदी असताना त्यांनी उत्तम कार्य केले. शहरातील पोलिसांना आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी उत्तमरीत्या काळजी घेतली. दरम्यानच्या काळात त्यांची खातेनिहाय बदली झाल्याने सध्या मुंबई पोलीस दलात सह पोलीस आयुक्त पदी कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी आजवर अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस दलात उपायुक्त, ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, अपर पोलीस आयुक्त, मुंबई दक्षिण विभाग, नाशिक पोलिस आयुक्त पदी कर्तव्य बजावले आहे.
विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या तालुक्यातल्या कोकरूड गावात झाला. त्यांनी आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले, तर कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बीए परीक्षेत ते सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले. त्यानंतर एमबीएची पदवी घेऊन त्यांनी प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली. लहानपणापासूनच विश्वास नांगरे पाटील हे बुद्धीवान होते. दहावीत असताना त्यांनी तालुक्यात प्रथम येऊन गावाचे नाव चमकवले. महाविद्यालयात असताना बारावीला चांगले गुण मिळाले असतानाही विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि अभियांत्रिकीला न जाता कला शाखा विभागात त्यांनी प्रवेश घेतला.

महाविद्यालयात असताना त्यांना महाविद्यालयाचा उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या शिक्षणाचे •प्रशासकीय अभ्याक्रमासाठी त्यांना मोलाचा हातभार लागला आणि सन १९९७ साली ते आयपीएस झाले. पोलीस खात्यात भरती झालेले विश्वास नांगेर पाटील हे लोकसेवेला व कायदा व सुव्यस्था राखण्यास प्राधान्य देत होते. याचा प्रत्यय पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलात अधीक्षक पदावर कर्तव्य बजावताना महाराष्ट्राने पाहिला आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे विश्वास नागरे पाटील हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले.
दरम्यानच्या काळात आपल्या कर्तव्याच्या अनोख्या स्टाईलने नाशिक पोलीस आयुक्तपदी कर्तव्य बजावत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव आला. सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन हजारांवर पोहोचली होती. सफाई कर्मचारी असे फ्रंट लाईन वर्कस अर्थात करोना योद्धे या संकटाला जीवाची बाजी लावून तोंड देऊ लागले. जनतेने घरातच थांबून प्रशासनाला आणि यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करत तत्कालीन नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वतः रस्त्यावर उतरून नाशिकमधील परिस्थितीवर लक्ष ठेवत होते.