डायल 112 कशी काम करते माहिती आहे का? जाणून घ्या!

मुंबई : महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल ११२ अंतर्गत महाराष्ट्र पोलिसांशी आपत्कालीन परिस्थितीत, संकटात व तणावाखाली आसलेल्या लोकांना तात्काळ संपर्क साधता येईल. हा क्रमांक लक्षात राहण्यास अतिशय सोपा आहे. शहरी व ग्रामीण भागात पोलिसांची मदत अवघ्या काही मिनिटात मिळवणे या प्रणालीमुळे नागरिकांना शक्य होणार आहे. नागरिकांना विशेषतः महिला, लहान मुले व वृद्धांना, संकटाच्या काळात त्वरित पोलीस मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे डायल ११२ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

डायल ११२ यंत्रणा तीन स्तरावर काम करतेः
अ. प्राथमिक स्तरः संपर्क केंद्र यातील पहिला स्तर हा संपर्क केंद्राचा आहे. यामध्ये प्राथमिक संपर्क केंद्र (PCC) नवी मुंबई व द्वितीय संपर्क केंद्र (SCC) नागपूर यांचा समावेश होतो. मदत हवी असणाऱ्या नागरिकांचा कॉल हा या संपर्क केंद्रांमध्ये प्रथमतः प्राप्त होतो. तेथून तो जिल्हा नियंत्रण कक्षाकडे पाठवला जातो. डायल ११२ यंत्रणेद्वारे मदत मिळण्याकरिता नागरिक टेलिफोन, मोबाईल सोशल मीडिया (फेसबुक, ट्विटर) तसेच सिटिझन पोर्टल, मोबाईल अॅप्लिकेशन याद्वारे संपर्क करू शकतात. तसेच यामध्ये SOS सारखे पॅनिक बटन अॅप देखील तयार केले आहे.

ब) द्वितीय स्तर जिल्हा नियंत्रण कक्ष:
जिल्हा नियंत्रण कक्ष (DCR) हे या यंत्रणेचा द्वितीय स्तर आहेत. महाराष्ट्रात ३४ जिल्हे व ११ पोलीस आयुक्तालये मिळून ४५ जिल्हा नियंत्रण कक्ष अद्ययावत करण्यात आले आहेत. संपर्क केंद्राकडून जिल्हा नियंत्रण कक्षास (DCR) प्राप्त झालेल्या कॉलरच्या माहितीचे विश्लेषण करून ती माहिती संबंधित आपत्कालीन प्रतिसाद वाहनावरील प्रशिक्षित अधिकारी / अंमलदाराकडील MDT (Mobile Data Terminal) वर पाठविली जाते.

क) तृतीय स्तर पोलीस आपत्कालीन प्रतिसाद वाहने:
हा या प्रणालीचा तृतीय स्तर आहे. यामध्ये सुमारे १४ हजार पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तसेच या प्रणालीकरिता १,५०२ चारचाकी वाहने व २,२६९ दुचाकी वाहने तयार ठेवण्यात आली आहेत.

पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती प्राप्त होताच आपत्कालीन प्रतिसाद वाहनावरील पोलीस अंमलदार मदत हवी असणाऱ्या नागरिकांच्या ठिकाणी तात्काळ पोहोचतात व त्यास कायदेशीर मदत करतात. पोलिसांकडून शहरी भागात ही आपत्कालीन मदत १० ते १५ मिनिटात तर ग्रामीण भागात १५ ते २० मिनिटात देणे शक्य होणार आहे. ही सर्व प्रक्रिया संबंधित संगणकीय प्रणालीमध्ये जतन (Save) केली जाते. डायल ११२ प्रकल्पामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या मनात दैनंदिन जीवनात सुरक्षेची भावना निर्माण होऊन जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक वाढेल, हे निश्चित!

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये :
1.प्राथमिक संपर्क केंद्र (PCC) येथे कॉल घेणाऱ्यांची (Call takers) संख्या १८३ तर द्वितीय संपर्क केंद्र (SCC) येथे ती ७९ आहे. इतर सहायक कर्मचाऱ्यांसह तीन शिफ्टमध्ये २४x७ काम करण्यात येते. प्रत्येक पोलीस नियंत्रण कक्षामध्ये २ तांत्रिक सहायक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
2.प्रतिसादाची वेळ (रिस्पॉन्स टाईम) ही शहरामध्ये जास्तीतजास्त १० मिनिट आणि ग्रामीण भागामध्ये १५ मिनिटे असेल. १५०२ चार चाकी वाहने व २२६९ दुचाकी वाहने याकरिता उपलब्ध असतील.


3.चार चाकी वाहनांवर प्रशिक्षित पोलीस अधिकारी / अंमलदार आणि दुचाकी वाहनांवर पोलीस अंमलदार कार्यरत असतील.
4.प्रत्येक वाहनावर जीपीएस आणि एमडीटी (Mobile Data Terminal) बसवलेले असतील.
5.बिझिनेस इंटेलिजेंस टूल्सच्या मदतीने दैनिक, साप्ताहिक, मासिक अहवाल प्राप्त होत आहेत.
6.डायल ११२द्वारे प्राप्त होणाऱ्या घटनांची संगणक प्रणालीद्वारे नोंद होऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येते. तसेच केलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करण्यात येतो.
7.पीसीसी (Primary Contact Centre), एससीसी (Secondary Contact Centre), डीसी (Data Centre Navi Mumbai), डीआरसी (Data Recovery Centre Bengluru). ४४ डीसीआर (District Control Room) मध्ये ५ वर्षे सिस्टम इंटिग्रेटर कार्यरत राहील.